जाऊ आनंदाच्या गावा - 10

भाऊ  आणि सता काकू 

आमच्या नव्याने बांधलेल्या चिरेबंदी वाड्यात दोन मुख्य परिवार राहायचे. एक म्हणजे आमचं वडील आणि चुलते असं सहा जणांचं कुटुंब आणि सोनारावाच्या चार मुलांची कुटुंब.आणि सोपानबापूच्या अर्जुन तात्याचं एक कुटुंब.अशी ११ कुटुंब या वाड्यात वास्तव्याला असायची. वाडाही अतिशय सुंदर बांधलेला पुढे भक्कम सागवानाचा मुख्य दरवाजा लागूनच आतमध्ये ढाळंज म्हणजे बैठकखोली नंतर रांगेत दोन्ही बाजूने ५-५ खोल्या आणि वाड्याबाहेर लागूनच पुन्हा एक प्रशस्त बैठक खोली, आणि मधल्या मोकळ्या दगडी चिऱ्याची फरशी असा फरसबंदी वास्तुपुरुष!

आमचे मोठे चुलते नामदेव भाऊ अतिशय कष्टाळू पण जन्मतःच एका हाताला बोटंच नाहीत कदाचित देवाने बोटं कोरायची विसरून गेलेली त्यामुळे नुसताच हाताच्या मुठीला गोळा चपखल हनुमंताच्या गदेसारखा. स्वभावानं शांत आणि कमी बोलणारे भाऊ घरात थोरले, अपार कष्ट उपसत यांची जिंदगी आता मावळतीच्या सूर्यासारखी थकून गेलीय पण नशिबातले कष्ट मात्र सुटले नाहीत. वंशाला दिवा पाहिजे या आशेपोटी झालेल्या ७ पोरींचा बाप आणि म्हातारपणात झालेला लेक असं १० जणांचं कुटुंब एका हातावर जगवणारे आमचे थकलेले मळकट धोतरातील भाऊ पाहिले कि मनात कालवाकालव होते. या सातपैकी ५ मुलींची लग्न लावून मुलालाही इंजिनियर बनवले फक्त एका हाताच्या कष्टावर! खरंच भाऊ तुम्ही ग्रेट आहात.

तसं माझं आणि भाऊंचं संभाषण विरळच,  गावी गेल्यावर मी त्यांना आवर्जून भेटतो, तब्येतीची विचारपूस होते. माझ्याकडे पाहून  त्यांना आपलाही मुलगा राम इंजिनियर होईल अगदी संतूबापूसारखाच ! हे त्यांचे खोल खोबणीत गेलेल्या डोळ्यातलं स्वप्न तरळल्याची मला स्पष्ट जाणीव व्हायची. आणि झालंही तसंच भाऊंचा एकुलता एक मुलगा रामही स्वभावाने आणि बुद्धिमत्तेने चांगला निपजला आणि आई बापाच्या कष्टाचं चीज करत मेकॅनिकल इंजिनियर झाला. जवळपास सर्व मुलींची लग्न झाली, संसार कसाबसा सुरळीत चालू आहेच पण भाऊंचे कष्ट कधी थांबले नाहीत. मुळात त्यांना स्वस्थ बसायची सवयच नाही सतत काहींना काही काम करत राहायचं हि त्यांची शेतकरी वृत्ती त्यांना भाग पाडते. आता वयोमानानुसार थकलेल्या शरीराने  भाऊंना शेतीतली अवजड कामे होत नाहीत म्हणून मग त्यांनी काही शेळ्या विकत आणल्या, त्या रोज दूर डोंगरात चरायला नेणं हा एकमेव उद्योग भाऊंचा चालू आहे. रोज पहाटे लवकर उठणे शेळ्यांच्या वाडग्यात जाऊन लेंड्या झाडून काढणे तान्ही करड प्यायला सोडणं त्यांचं पोटभर पिऊन झाल्यावर मग शेळ्यांचे दूध काढणं, सकाळची आन्हिकं आटोपून पोटभर न्याहारी करून शेळ्या सोडून डोंगराकडे चरायला घेऊन जाण असा आमच्या भाऊंचा कमी कष्ट करण्याचा शॉर्टकट सध्या चालू असतो.

आमची थोरली काकू म्हणजेच भाऊंच्या एका हाताचे तीन करणारी भाऊंची धर्मपत्नी आमची सता काकू !
स्वभावाने अतिशय फटकळ  आणि गळ्यात प्रचंड बळ त्यामुळे काकूच साधं बोलणंही नवीन माणसाला आरडाओरडा किंवा भांडण वाटेल असंच. जेवढ्या शिव्या आमच्या अक्काला येतात त्याच्या कैकपटीने जास्त शिव्या सता काकूला देता येतात आणि तेही कर्कश आवाजात. आमची अक्का आणि काकू दोघीहि चुलत बहिणी त्यामुळे त्यांच्यात भांडणाची सवय हि बालपणापासूनच. त्यांचं भांडण लागल्यावर मात्र ते अम्हासाठी पर्वणी असे.
कारण यात विजय कुणाचा होणार याची उत्सुकता जास्त असे. काही दिवसांचा अबोला धरून भांडण मिटायचं आणि पुन्हा सर्व काही सुरळीत व्हायचं. पण या मोठ्यांच्या भांडणात आम्हा बारक्याना नाहक त्रास सहन करावा लागायचा. आम्ही भांडण मिटेपर्यंत एकमेकांच्या घरी जायचं नाही कि बोलायचं नाही जर तसं करताना आढळलं तर मार आणि शिव्या दोन्हीही!! त्यामुळे आम्ही भावंडं भांडण मिटण्याची आतुरतेने वाट पाहायचो. आता आमची अक्का आणि काकू दोघीही शांत झाल्यात. नवीन जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात त्यात कधी कधी त्याची फरफट फजिती होते पण आम्ही त्यांना समजून घेतो. नवीन जीवनपद्धती अंगीकारणे त्यांना तितकं सोप्पही नाहीय, ज्यांचा जन्म शेती-माती , गुर-ढोरं आणि गावातच गेला त्यांना या चमचमणाऱ्या जगात थोडंसं अवघडल्यागत होणं साहजिकच आहे. आम्ही आता नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतो त्यामुळे आयुष्यभर भांडणाऱ्या या बहिणी उर्फ जावा-जावा आता एकमेकींचं दुखणं-खुपणं, खाणं पिणं जपतात , एकमेकींना जीव लावतात हे पाहून मला विशेष वाटत. पण खरंय,  जास्त पिकल्याशिवाय फणसाला गोडवा येत नाही तसंच माणसाचंही असतं असं पु.ल म्हणायचे. ते इथे तंतोतंत लागू पडतं.

काकूने काही महिन्यापूर्वी माझ्या पुण्यातील घरी भेट दिली, आषाढी एकादशीला आळंदीला आली असता एक दिवस माझाकडे मुक्कामी राहिली. माझा सुखाचा संसार पाहून काकूच भारावलेलं मन मला प्रचंड काही सांगून गेले. कारण काकूने माझ हलाखीचं आणि प्रचंड कष्टाचं विद्यार्थी जीवन पाहिलं होत. त्याच मी चीज केल्याचं समाधान काकूला होत माझ्यासाठी हि माझ्या अल्पशा यशाची लाखमोलाची पावती होती.

खरंच कशी असतात ही खेड्यातली अडाणी माणसं? तोंडावर तिखट बोलायचं, कडाक्याची भांडणही करायची पण सुख दुःखात एकमेकांना सांभाळून घायचं हे त्यांच्या जगण्याच्या पुस्तकातून आलेलं अनुभवी अडाणी ज्ञान मला कधी कधी आमच्या पुस्तकी सुशिक्षित ज्ञानापेक्षाही जास्त चांगलं वाटतं......



- संतोष विघ्ने

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जाऊ आनंदाच्या गावा - 2

जाऊ आनंदाच्या गावा - 1

जाऊ आनंदाच्या गावा - 9