Posts

Showing posts from 2018

जाऊ आनंदाच्या गावा - 10

भाऊ  आणि सता काकू  आमच्या नव्याने बांधलेल्या चिरेबंदी वाड्यात दोन मुख्य परिवार राहायचे. एक म्हणजे आमचं वडील आणि चुलते असं सहा जणांचं कुटुंब आणि सोनारावाच्या चार मुलांची कुटुंब.आणि सोपानबापूच्या अर्जुन तात्याचं एक कुटुंब.अशी ११ कुटुंब या वाड्यात वास्तव्याला असायची. वाडाही अतिशय सुंदर बांधलेला पुढे भक्कम सागवानाचा मुख्य दरवाजा लागूनच आतमध्ये ढाळंज म्हणजे बैठकखोली नंतर रांगेत दोन्ही बाजूने ५-५ खोल्या आणि वाड्याबाहेर लागूनच पुन्हा एक प्रशस्त बैठक खोली, आणि मधल्या मोकळ्या दगडी चिऱ्याची फरशी असा फरसबंदी वास्तुपुरुष! आमचे मोठे चुलते नामदेव भाऊ अतिशय कष्टाळू पण जन्मतःच एका हाताला बोटंच नाहीत कदाचित देवाने बोटं कोरायची विसरून गेलेली त्यामुळे नुसताच हाताच्या मुठीला गोळा चपखल हनुमंताच्या गदेसारखा. स्वभावानं शांत आणि कमी बोलणारे भाऊ घरात थोरले, अपार कष्ट उपसत यांची जिंदगी आता मावळतीच्या सूर्यासारखी थकून गेलीय पण नशिबातले कष्ट मात्र सुटले नाहीत. वंशाला दिवा पाहिजे या आशेपोटी झालेल्या ७ पोरींचा बाप आणि म्हातारपणात झालेला लेक असं १० जणांचं कुटुंब एका हातावर जगवणारे आमच...

जाऊ आनंदाच्या गावा - 9

Image
गावगाडा भारतात ग्रामीण संस्कृती जितकी समृद्ध होती तितकी कुठल्याच देशात बहुधा नसावी किंबहुना नव्हतीच इतरत्र. ज्यावेळी पाश्चिमात्य देशात रानटी संस्कृती जोर धरत होती त्यावेळी हिंदुस्थानातील गावे वेदघोषाने जागी व्हायची आणि कीर्तनाने आत्मतृप्त होऊन निद्राधीन व्हायची. स्वयंपूर्ण खेडी, कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि बाराबलुते अठरापगडजातींनी भरलेले गाव, कित्येक चांगल्या वाईट परंपरा इथे जन्माला आल्या नंतर काही लुप्त झाल्या आणि काही टिकल्याही. त्यातल्या त्यात पूर्वीचे निबिड अभयारण्य आणि सध्याच्या मराठवाड्यात तर सतत आक्रमणं,लढाया अगदी कृष्ण देवरायापासून किंवा शालिवहनाच्या शासनकाळापासून ते अलीकडील मराठे, निजाम आणि नंतर स्वतंत्र भारत या सर्व संक्रमणाच्या काळात मराठवाड्याच्या ग्रामीण संस्कृतीवर मोठा परिणाम पाहायला मिळतो.  या सर्व कठीण, अतिकठीण किंवा सुकर काळात आमच्या गावानेही अनेक प्रसंग आपल्या पोटात सामावून घेतले पण आम्हाला मोजकेच माहित आहेत एवढंच. पूर्वीचे आनंदगाव म्हणजे बहुतेक २०० वर्षांपूर्वी नक्की काळ सांगता येणार नाही पण जुन्या जाणत्या माणसाकडून ऐकायला मिळाले त्...

जाऊ आनंदाच्या गावा - 8

Image
हरीमाय  आमचे दादा म्हणजे वडिलांचे वडील बन्सी रावजी विघ्ने. अतिशय बेरकी माणूस. अंगात प्रचंड ताकद, धिप्पाड शरीरयष्टी आणि अहोरात्र शिंदीवनात नशेत सुस्त मस्त जीवन जगणारी एक दिलदार आसामी!  पाटलाचे साहेबराव आणि आमचे दादा हे जिवलग मित्र शिंदीवनात यांची मैत्री सुरू झालेली ती शेवटपर्यंत टिकली. यांचे आहारशास्त्रही सर्वसमावेशक, अगदी बैलापासून ते मोरापर्यंत सर्वच प्राणीपक्षी यांच्या पोटाची आणि जिभेची हौस पूर्ण करणासाठी चालायचे.  एकदा भावकीच्या भांडणाचा राग मनात धरून यांनी एकजणांचा बैल कापून, शिजवून फस्त गेला असा किस्साही दादांनीच आम्हाला सांगितला होता. रावजीबुवांचा एकुलता एक वंशाचा दिवा असल्यामुळे जडणघडण तशी अतिशय बेफिकीरीत झालेली. आणि त्याचा परिणाम म्हणून बन्सीराव आणि वाद हे समीकरण गावाला मान्यच करून घ्यावे लागले. त्यावेळी गावाच्या पाटलाला सुद्धा यांनी कधी जुमानले नाही पाटलांसोबतसुद्धा मारामारी करून त्यांच्याही दहशतीला आव्हान देणारे हे गावातले पहिलेच गावकरी नंतर पाटलांच्याच नात्यातील मुलगी यांनी दुसरी धर्मपत्नी म्हणून घरात आणली ती म्हणजे आमची आजी ह...

जाऊ आनंदाच्या गावा - 7

Image
शाळेतला पहिला दिवस प्रत्येक गोष्टीच एक वय असतं आणि त्याचे अर्थही प्रसंगानुरूप लावले जातात. पोरगी वयात आली म्हणजे इथे वेगळाच शृंगारिक अर्थ वगैरे किंवा पोराचं वय निघून चाललंय इथंही भलताच काळजीचा अर्थ, आता वय झालं ! इथं निराशावाणा अर्थ, या वयात तुम्हाला हे शोभतं का?असा टोमानवजा अर्थही वयोमानावरून काढता येतो शेवटी काय तर मराठीचे बोल कौतुके।।आता आमचंही वय शाळेत घालण्याजोगं झालं होतं एवढ्यासाठीच वयाची इतकी ऐशीतैशी !! आणि मग याच वयाचा दाखला देऊन  एके दिवशी घरच्यांनी शाळेत नाव घालायचं असं ठरवलं. मग काय आनंदाचे डोही आनंद तरंग आपण शाळेत जाणार म्हणजे नवे कपडे, अनवाणी पायाला एक नवी कोरी पॅरागॉनची चप्पल आणि दप्तर, पाटी पेन्सिल असं सर्वच नवीन मिळणार. शिवाय रोज संध्याकाळी घरी जेवणानंतर कविता, बाराखडी म्हणून दाखवल्यावर सगळेच कौतुक करणार आणि आपण काहीतरी वेगळे आहोत याचा अनुभव अगदी बालवयातच, पुढे जाऊन  काही त्याला अहंकार म्हणून वाढवतात तर काहीजण आत्मविश्वास! पण व्यक्तिमत्वाची बीज अशाच छोट्या मोठ्या गोष्टीतून पेरली जातात बरं लहानपणात! आमच्या सवंग...

जाऊ आनंदाच्या गावा - 6

Image
खोडकर आणि खेळकर बालपण  आमच्यात सर्वात जास्त चपळ आणि कुटाणेखोर असायचा तो म्हणजे प्रभू अण्णाचा हण्या आम्ही त्याला बप्पा म्हणत असू. याच्या मेंदूत सतत काहींना काही तरी नवीन शक्कल यायच्या. एकदा हा त्याच्या आजोळी सोनगिरीला गेला आणि एक नवीनच खेळ घेऊन आला, घोड्यावरचा राजा आणि पहिला प्रयोग केला तो बिचाऱ्या किरीमावरच. किरिमा म्हणजेच बळीराम त्याला करिष्मा म्हणता येत नव्हतं म्हणून तो किरिमा असं म्हणायचं पुढं हीच त्याची चीड पडली. महाराज म्हणून एकमुखाने किरिमाची निवड झाली सगळी वानरसेना महाराजांचा जयघोष करू लागली... महाराजांना घोड्यावर बसवण्यात आलं. महाराजांचा घोडा म्हणून आडदांड टूम्या महाद्याला वाकवण्यात आलं आणि महाराज डोळे मिटून घोड्यावर बसले. आता खरी गम्मत इथून पुढे ....  मला महाराजांच्या हातात तलवार द्यायचं काम सोपवलं होतं ती तलवार म्हणजे घाणीत बुडवलेली काठी! जिकडून बुडवली ती बाजू महाराजांच्या हातात द्यायची हे काम म्हणजे खरं तर मार   खायची पंचाईत म्हणून हण्याने मुद्दाम हे काम स्वतःकडे घेतले नाही. मी पटकन महाराजांच्या हातात ती गुशोभित...

जाऊ आनंदाच्या गावा - 5

Image
बालवाडी आणि वानरसेना अजून शाळेत नाव घातलं नसल्यामुळे आम्हाला फक्त बालवाडीतच प्रवेश असायचा. आमची बालवाडी म्हणजे सिमेंटच्या भिंतीवर पत्र्यांच्या छताची गावातील एक पक्की इमारत. इमारतीत एक वजनकाटा, धुराने काळवंडलेले मोठे पातेले, एक लांब पळी आणि एक चुलांगण, खाली फरशी आणि भिंतीवर विविध चित्रे आणि पोस्टर्स. बालवाडीत येताना प्रत्येकाने घरून आपापली ताटवाटी घेऊन यायची आणि एका रांगेत बसायचं असा सुशीला काकींचा शिरस्ता असायचा. सुशीला काकी प्रचंड कडक शिस्तीच्या आणि रागीट तर मंगल काकी मात्र शांत स्वभावाच्या. सुशीला काकींनी आता बालवाडी सोडली पण मंगल काकी अजूनही मुलांसाठी खिचडी बनवतात. खिचडी शिजायला वेळ असला कि, सुशीला काकी आमच्याकडून कसली तरी गाणी आणि बाराखड्या मोठ्याने म्हणून घ्यायच्या, आम्हीही इतरांच्या सुरात सूर मिसळून ओरडायचो. पण आमचं लक्ष मात्र कोपऱ्यात मांडलेल्या भल्यामोठ्या चुलंगणावरील पातेल्याकडेच. मंगल काकी जाळ फुकून फुकून बेजार झाल्या कि मग आमच्यातल्याच दोन-चार आडदांड पोरांना बारीक काटक्या गोळा करून आणायला पाठवायच्या. बालवाडीच्या पाठीमागे भ...

जाऊ आनंदाच्या गावा - 4

Image
माझं आजोळ बालपणी सर्वात जास्त आवडती गोष्ट कुठली? तर ते म्हणजे आपल्या मामाच्या गावाला जाणे. प्रत्येकाला आतुरता असते ती आपल्या आजोळात जाऊन राहण्याची ;मामा, मावश्या, आजी ,आजोबा यांच्याकडून हट्टाने लाड पुरवून घेण्याची आणि मौजमजा करण्याची. जेवढा आनंद आपल्या आईला माहेरी आल्याचा होतो त्यापेक्षा कैकपटीने जास्त आनंद आपल्याला मामाच्या घरी आल्याचा होतो. काहींना आजोळ लांब असल्यामुळे वर्षातून एक दोनदा जायला संधी मिळते तर काहींना महिन्यातून एक दोनदा, पण माझ्या बालपणात मला तर रोजच आजोळी जायला मिळायचे कारण माझे आजोळ हे गावातच होते. आमच्या मामाचे घर म्हणजे दगडा मातीच्या खुज्या भिंती आणि वरती छप्परावर कडुलिंबाचे वासे आणि सरमाडाच्या पेंढ्यानी शेकारलेलं गोठ्यावजा घर. ठिकठिकाणी अठराविश्व दारिद्र्याच्या खुणा जाणवतील असं मोडकंतोडकं संसारगाडगं आमची आजी मोठ्या कसरतीने चालवत होती.  समोरील अंगणात राम्या आणि लक्ष्या नावाची खिलारी बैलजोडी, एक गावरान म्हैस, घराची रखवाली करायला एक बंड्या नावाचा गुबगुबीत काळ्या रंगाचा कुत्रा, पाणईला टेकवलेली सायकल, गार कडुनिंबाच्...

जाऊ आनंदाच्या गावा - 3

Image
आमची वानरसेना आणि धर्मा तात्या आमची उपद्रवी वानरसेना मात्र खूप छान जमली होती, गण्या, बाल्या, हण्या, गोपी, संदीप, बळ्या, दिड्या, संत्या(मी स्वतः), बाब्या,नित्या, सोम्या, बुट्टा बाब्या, मल्ह्या, नाऱ्या, मन्या, राज्या, राम्या, संज्या, आवड्या , बाळ्या अशी अनेकजण आमच्या सेनेचे पराक्रमी सदस्य होते. आमची टोपणनावं(चिडवायची नाव) पण फार मजेदार होती, किडक्या, शेपाळ्या, तटक्या, किरीमा, शेम्बड्या, बुट्ट्या, भटग्या, नान्या, शामल आणि अजून बरीच..... वानरसेना .........  गावातील लोकं रानात गेल्यावर आम्ही गावात उरलेली वानरसेना साधारण ४ ते ५ वर्षे वयोगटातील कार्टी सुशीला काकींच्या बालवाडीत जाऊन सुकडी किंवा खिचडी  खाऊन परत देवळा समोर जमा व्हायचो. आणि कोणता खेळ खेळायचा कि रानात हुंदडायला जायचं की अजून काही करायचं यावर गोंधळ / गोंगाट सुरु करायचो ,आमच्या या गोंगाटाच्या आवाजाने वैतागलेली देवळात पत्ती खेळणारी म्हातारी हातात काठी घेऊन आमच्या मागे मारायला धावायची, पण कुणीही हाती लागत नसे,  कचक तुटलेली आणि ठिगळं जोडलेली हाफ चड्डी एका ...

जाऊ आनंदाच्या गावा - 2

Image
गावरान सकाळ  आमचा वाडा भल्या पहाटे कावळ्यांच्या सभेने जागा होई, वाडयासमोर असलेल्या मोहनदादांच्या मोकळ्या जागेत एक जुनाट कडुनिंबाचे झाड होते त्यावर फांद्यांच्या दुबेळक्यात काटक्यांची घरटी थाटून असलेले हे कावळे सर्वात अगोदर जागे होत. खरं तर कावळा हा पक्षी म्हणजे प्राणिसृष्टीत सर्वात पहिला जागा होणारा पक्षी ! आणि सोबत आपल्या बांधवांनाही जागा करतो, आणि त्यांच्यानंतर मग जागी होते अवघी जीवसृष्टी. गावाकडची सकाळ सुरु होते ती नानाविविध पक्षाच्या किलबिलाटाने,विधात्याने मुक्त हस्ताने स्वरांची उधळण केलेले कोकीळ, भारद्वाज, चिमण्या, कारंडव, काक म्हणजे स्वर्गीय गंधर्वच जणू ! त्यांच्या सोबतीला सहगायकाची भूमिका निभावणाऱ्या भ्रमर आणि मधुमाश्यांचा गुंजारव दिव्य संगीताची अनुभूती देणारी असते . आणि या सगळ्यात एखाद्या पारिजातकाच्या फुलाने आपल्या सुवासाची दरवळ वाऱ्याच्या झुळूकेबरोबर मिसळून वातावरनात अजूनच प्रसन्नता आणावी. आकाशात गुलाबी, लालसर, तांबट रंगाच्या ढगांची पूर्व दिशेला चाललेली दाटीवाटी आणि त्यातुन उंचच उंच भरारी घेणारा पक्षिराज...

जाऊ आनंदाच्या गावा - 1

Image
भाग १- अल्प परिचय  भूतकाळातल्या  काही आठवणी सदैव आनंद देणाऱ्या असतात विशेषतः बालपणीतल्या !  जेव्हा आपण  आपले जुने बालमित्र भेटल्यावर आभासी प्रतिष्ठेचा मुखवटा बाजूला ठेवून मनमोकळ्या गप्पा मारतो, त्यातला आनंद काही औरच ! कारण ते क्षण आसतातच तेवढे अनमोल निरंतर सुखाची अनुभूती  देणारे. म्हणून तर संत तुकारामांनी म्हणून ठेवलय  ।। लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।। म्हणून मलाही वाटले आपणही आपल्या बालपणाबद्दल लिहावं, जुन्या आठवणीत रमावं  आणि त्यातून मिळणारा आनंद आपल्या सर्वासोबत वाटून घ्यावा. म्हणून हा लेखनप्रपंच ! चला तर मग, मी माझा अल्पपरिचय करून देतो माझं पूर्ण नाव: संतोष तुकाराम विघ्ने रा.आनंदगाव ता. शिरूर (का) जि. बीड (सध्या वास्तव्यास पुणे)  माझा जन्म नक्की किती तारखेला झाला आणि कोणत्या वर्षी झाला हे मलाही आणि माझ्या आईवडीलांना नक्की माहीत नाही. कानाला हात पुरतो म्हणून गुरुजींनी शाळेत नाव घेतलं.एवढाच काय तो आमच्या पृथ्वीवरील अवताराचा ढोबळ पुरावा. माझ्या जन्मागोदार मोठ्या बहिणीनंतर 3 लेकरं दगावल्यामुळे आई ...